गेवराई : शहरात गेल्या काही दिवसात जनावरांच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली असून याचा तपास योग्य पद्धतीने करून चोरट्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भारतीय मराठा महासंघाने पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरात मागील काही दिवसांपूर्वी जनावरांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या संबंधी पशू मालकांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देखील दिली आहे. यावर अद्यापपर्यंत कसलीच कारवाई झालेली नाही. तसेच शहरातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात टेम्पोमध्ये गोधन, जनावरे टाकून बाहेर गावी नेत असल्याचे दिसून आले आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कारवाई झाली नाही. जनावरांच्या चोरी प्रकरणी योग्य ती कारवाई करावी यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, तहसीलदार सचिन खाडे,पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांना भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी शाम गायकवाड, दत्तात्रय पत्की, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोटे, संभाजी निकम, शाम निकम, महेश पवार, अक्षय पवार, गोविंद पवार आदी उपस्थित होते.
गेवराईत जनावरांची चोरी, तपास मात्र ढिम्म - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:23 AM