बीड : श्रीकृष्ण आणि वनराई यांचे नाते अतूट आहे म्हणून गोविंदा पथकांनी व कृष्ण भक्तांनी झाडांसाठी श्रमदान रूपी दहीहंडी रुजवावी, असे आवाहन निसर्ग सेवक अभिमान खरसाडे यांनी केले आहे.
भगवान श्रीकृष्ण बाळ गोपाळांसह वनराईमध्ये खेळ खेळत होते. त्यापैकीच वृंदावन, नंदनवन, निधीवन ही काही परिचित वने श्रीकृष्ण चरित्रात येतात. बालसंवगड्यांसाठी ‘गोपाळकाला’ ही संकल्पनादेखील कृष्णाने वनराईच्या साक्षीने रुजविली. मानवतेच्या अस्तित्वासाठी व जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी वनराईची निर्मिती करून श्रीकृष्णाचे आवडते झाड ‘कदंब’ या वृक्षाचे रोपण यानिमित्ताने करावे म्हणूनच आहेर वडगाव येथील शिवराई वन प्रकल्पामध्ये कृष्ण भक्तांसाठी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते १२ व सायंकाळी तीन ते सहा या वेळेत वृक्षांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. तरी निसर्गप्रेमी गोविंदा पथकांनी, ग्रुप,क्लब यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निसर्ग भूमी संवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.