कडा : ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टरांनी हलगर्जीपणा न करता कोरोनाबाधित रुग्णाला लगेच उपचारासाठी रुग्णालयात भरती करून घेणे गरजेचे आहे. बरेच डाॅक्टर फक्त गोळ्या, औषधे देऊन पेशंटला सोडून देत असल्याने तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे असा हलगर्जीपणा होता कामा नये, अशा कडक शब्दात आष्टीच्या नायब तहसीलदार शारदा दळवी यांनी दिल्या आहेत.
संपूर्ण जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या आणि आष्टीची संख्या समान असल्याने तालुक्यात कोरोनाचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसल्याने तहसील कार्यालयातील सभागृृृृृहात सोमवारी तालुक्यातील सर्व शासकीय डाॅक्टरांची बैठक आयोजित केली होती. यावेळी नायब तहसीलदार दळवी बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राहुल टेकाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी दळवी म्हणाल्या, संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. मात्र, आष्टी तालुक्याची संख्या कमी होताना दिसत नाही. लोक नियम पाळायला तयार नाहीत. कुणी मास्क बांधत नाही. दुकानदारही नियम पाळताना दिसत नाहीत, तसेच कोरोनाबाधित रुग्ण आल्यावर त्याला गोळ्या, औषधे देऊनच सोडून दिले जाते. परिणामी आठ-दहा दिवसांनी त्या पेशंटची स्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना गोळ्या, औषधे देऊन न सोडता त्याला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचनाही ना. तहसीलदार शारदा दळवी यांनी दिल्या.