बीड : मागील दोन दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या सौम्य पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा आधार झाला आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. रोज सकाळच्या टप्प्यात ऊन व दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होते. मात्र, पाऊस नसल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर होती. दोन दिवसांत तालुक्यातील ईट, जवळा, पिंपळनेर परिसरात हलका पाऊस झाल्याने पिके तरारली आहेत.
-------
बीड शहरात विजेचा लपंडाव
बीड : शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला असून यातच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही भागांत रात्री बारा वाजेनंतर अर्धा ते एक तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
----------
बांधकाम साहित्य रस्त्यावर
बीड : शहरातील विविध भागांत घरे, दुकाने, काॅम्प्लेक्सची बांधकामे सुरू आहेत. यासाठी आणली जाणारी वाळू, विटा, खडी रस्त्यावरच ढिगारे टाकून ठेवली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. वाळू आणि कचखडी रस्त्यावर पसरत असल्याचे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मागणी होत आहे.
---------
कृषी दुकानांवर वर्दळ थंडावली
बीड : मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि कृषी विक्रेता दोघे चिंताक्रांत आहेत. शेतात पेरलेल्या पिकांचे काय होईल, याची शेतकऱ्यांना तर दुकानात कृषी औषधी, खते खरेदीसाठी ग्राहक नसल्याने विक्रेत्यांना चिंता लागली आहे. दोन दिवसांत काही ठिकाणीच पाऊस झाल्याने बाजारात वर्दळ थंडावलेली दिसत आहे.