गेवराई : राक्षसभुवन येथील नेहा धर्मराज कोरडे (वय ९) आणि अमृता धर्मराज कोरडे ( वय ७ ) या दोन बहिणींचा गोदावरी नदीपात्रातील डोहात बुडून झालेल्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वाळू तस्करांनी गोदावरी नदीपात्रालगतच्या गट नं. १९२ येथे अवैध वाळू उपसा करताना मोठे मोठे खड्डे खोदल्यामुळे या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलींच्या मृत्यूला अवैध वाळू उपसा करणारे वाळू तस्कर आणि त्यांना संरक्षण देणारे ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार हे जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, गोदावरी नदीपात्रातून होणारा वाळू उपसा तत्काळ बंद करावा आणि कोरडे कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, जालिंदर पिसाळ, शांतीलाल पिसाळ, गजानन काळे, गणपत काकडे, अशोक बोरकर,दत्ता पिसाळ,पाराजी मोटे,संतोष शेजुळ,रामेश्वर मुटके यांच्यासह जिल्ह्यातील धनगर समाजातील नेत्यांनी पालकमंत्री मुंडे यांच्याकडे केली आहे.