नेकनूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचा माल शेतामधेच राहून तो खराब झाला. त्या मालाला मार्केटमध्ये नेता आले नाही. त्यामुळे सध्या शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज येथील एसबीआय शाखेकडून मिळत नाही.
सदैव लोकांसाठी राबणारा शेतकरी आज अडचणीत आहे. त्याला उभारी देण्याची आज गरज आहे. अशा संकटाच्या वेळी त्याला पीक पेरणीसाठी पैशाची गरज आहे; पण नेकनूरमधील एसबीआय बँकेचा शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे खूप मोठ्या अडचणी त्याच्यासमोर निर्माण आहेत. लवकरात लवकर शाखा व्यवस्थापक पद भरण्यात यावे व त्यांचा मार्ग मोकळा करावा. नेकनूर परिसरातील लोक दरवर्षी पेरणीसाठी व खत बियाणांसाठी पीककर्ज घेत असतात. ते कर्ज आपले पीक आल्यानंतर फेडत असतात. पण शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे ऐन पेरणीच्या काळात पीककर्ज मिळत नसून, त्यामुळे लवकरात लवकर शाखा व्यवस्थापक पद भरण्यात यावे व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी खूप अडचणीत आहेत. पेरणीच्या वेळी एसबीआय शाखा नेकनूरमधील शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. पेरणीसाठी व मशागतीसाठी त्यांना पैशाची अत्यंत आवश्यकता आहे व नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर शाखा व्यवस्थापक पद भरून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.
अरविंद जाधव (सामाजिक कार्यकर्ते)