बीड : पाटोदा तालुक्यातील सौताडा, धनगर जवळका परिसरात गेल्या चार दिवसांत काही ठिकाणी भिज पाऊस झाला, तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने १५ दिवस दडी मारली होती. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांत काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. तालुक्यात वर्षभरापूर्वी अनेक ठिकाणचे रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, झालेल्या मोठ्या पावसामुळे व कंत्राटदारांनी काम करताना रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे झाली. एक वर्षाचा कालावधी लोटला तरी रस्त्याच्या बाजूला तयार करण्यात येणाऱ्या साइडपट्ट्यांची कामे अजूनही झाली नाहीत.
जीर्ण तारा, खांबामुळे धोका
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युत खांब व विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले खांब वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युत खांब लावण्यात यावेत व शहरातील जीर्ण झालेल्या तारा व खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा विसर
गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत, यामुळे कोविडचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी करू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने निर्बंध लादण्याची व अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
विविध बांधकामे वाळूअभावी ठप्प
वडवणी : कोरोनाच्या संसर्गापाठोपाठ प्रशासकीय उदासीनतेमुळे शासनाच्या विविध आवास योजनांतील घरकुलांची कामे ठप्प आहेत. वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरातील विविध योजनांच्या घरकूल लाभार्थींसाठी वाळू उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे घरकूल बांधकाम करताना वाळूची समस्या निर्माण झाल्याने लाभार्थींना बांधकामे बंद ठेवावी लागली. घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.