अंबाजोगाई : राज्यातील शाळा अद्यापही बंद आहेत. शाळा, महाविद्यालये केव्हा सुरू होतील?, हे सांगता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना शासनाने मोबाईल किंवा टॅब मोफत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांनी केली आहे.
कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० च्या मध्यावर शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला. शिक्षक आणि विद्यार्थी घरात अडकून पडले. यानंतर प्राथमिक ते अगदी पदव्युत्तर स्तरावरील अध्ययन व अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. असे असले तरी हा अभ्यासक्रम सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. असे म्हणता येणार नाही. गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल विकत घेणे मोठ्या जिकरीचे काम आहे. तर शेतमजूर,बांधकाम मजूर व अनेक वंचित घटकातील अनेक पालकांना आजही मुलांसाठी स्वतंत्र मोबाईल घेणे शक्य नाही. शिक्षक असो वा विद्यार्थी काळाबरोबर चालण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणे आणि ती काळानुरूप अद्ययावत करत जाणे. आधुनिक व नवीन तंत्रज्ञानाचा फायदा सामान्य व उपेक्षित विद्यार्थ्यांना ही झाला पाहिजे, यासाठी या मुलांना टॅब अथवा मोबाईल शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे. कर्नाटक शासनाने गरजू मुलांना मोबाईल देणे सुरू केले आहे. त्याचप्रकारे केंद्र किंवा राज्य शासनाने गरीब व होतकरू मुलांना मोबाईल अथवा टॅब मोफत द्यावेत. तरच उपेक्षित विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील, असेही कुलकर्णी यांनी निवेदनात म्हटले आहे.