बीड : पाण्याचा अनावश्यक उपसा थांबवून जलबचत करण्यासाठी नागरिकांनी सजग राहून उपाययोजना करण्याची गरज आहे. जलबचतीतून समृद्धी साधण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले. भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बीड येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीने जलबचत आणि जलपुनर्भरणाबाबत जनजागृती उपक्रमातून नागरिकांना जलसाक्षरतेचे धडे देण्यात आले. १ जुलैपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील ३४ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन वेबिनारद्वारे जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ५८ महिला बचत गटांनाही जलबचतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तर राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्राच्या अठराशे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन जलसाक्षरतेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. १ ते १६ जुलैपर्यंतच्या भूजल साक्षरता अभियानात दररोज तीन प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, रासेयो अधिकारी अन्य प्राध्यापक विद्यार्थी, गावांचे सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्य या मार्गदर्शन सत्रात सहभागी झाले होते.
पाण्याच्या ताळेबंदावर मार्गदर्शन
भूजल कोठे असते? भूजलाचे वहन कसे असते? जिल्ह्यातील पर्जन्यमान किती? त्याची काय कारणे आहेत. जिल्ह्यातील शेती, पीक, उत्पादन, तसेच पाण्याचा उपसा कमी होण्यासाठी विहीर व बोअरवेलचे पुनर्भरण आणि पाण्याचा ताळेबंद या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तज्ज्ञांनी दिली माहिती
भूजल आणि भूविज्ञानाबाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. व्ही. पवार, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. जी. मुळे, आदींनी या अभियानात मार्गदर्शन करून जलपुनर्भरण आणि जल बचतीसाठी करावे लागणारे उपाय या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
जलपुनर्भरण आवश्यक
शहरातील लोकांनी विहिरींचे, तसेच बोअरवेलचे पुनर्भरण केले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणेही महत्त्वाचे आहे. तसेच शेतातील विहिरी व बोअरवेलचे शेतकऱ्यांनीदेखील पुनर्भरण करावे. विहीर पुनर्भरण करण्यासाठी मनरेगा अंतर्गत अनुदान उपलब्ध आहे. त्याचा लाभ घेता येऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. व्ही. पवार यांनी दिली.
150721\15_2_bed_10_15072021_14.jpg
जलप्रतिज्ञा घेताना भूजल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक