गेवराई : राष्ट्रीय महामार्ग हा आयआरबीकडे असल्याने रस्ता चांगला होईल व अपघात घडणार नाहीत, असे वाटले होते. मात्र या कंपनीकडून टोल वसुलीला प्राधान्य देऊन बाकी सगळा नियोजनशून्य कारभार चालल्याने या महामार्गावर रोजच अपघात घडत असून, ते नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. त्यामुळे संबंधित आरबीआय कंपनीने याकडे लक्ष देऊन सुरळीत नियोजन करून या मार्गावर होणारे अपघात टाळावेत; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५२ वर बीड - गेवराई दरम्यान अपघातांची मालिका रोज सुरू असून, आयआरबी कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दर आठ दिवसाला या महामार्गावर एक-दोन नागरिकांचा बळी जात आहे. तर अनेक ठिकाणी दुभाजक ओलांडताना अडथळे निर्माण होत असून, या ठिकाणी बॅरिकेट असणे आवश्यक आहे. वडगाव ढोक फाटा, गेवराई बायपास, बीड बायपास, पाडळसिंगी या ठिकाणी मोठे दिशादर्शक फलक लावून अपघात टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे. रस्त्यावरील बंद पथदिवे तत्काळ चालू करण्यात यावेत. गतिरोधकाची उंची वाढवून घ्यावी. अपघातस्थळी रुग्णवाहिका वेळेवर पाठवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित कंपनीने आठ दिवसांच्या आत सर्व नियोजन व्यवस्थित करावे; अन्यथा पाडळसिंगी टोल नाका येथे मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष मोटे यांनी दिला आहे.