पावसामुळे ग्रामस्थांचे हाल
अंबाजोगाई : अंबाजोगाई व परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय झाले असून या रस्त्यांवरून प्रवास करताना ग्रामस्थांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची वाट लागली आहे.
‘त्या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
अंबाजोगाई : आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेचा हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात दिले जात आहे. कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील निधी जमा करण्यात आला.
रस्त्यावरील वाहनामुळे नागरिकांना अडचण
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने ठेवण्यात येतात. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण जात आहे. सध्या कोरोनामुळे बाजारपेठ दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे अनेकजण बाजारात गर्दी करीत आहेत. परिणामी नागरिकांना रहदारी करण्यास अडचण होत आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नवीन वस्त्यांमध्ये वीजखांब नाही
अंबाजोगाई : शहरालगत असणाऱ्या जोगाईवाडी व पोखरी परिसरात नवीन वस्त्यांमध्ये पथदिव्यांची आवश्यकता आहे. मात्र अद्यापही वीज खांब लावण्यात न आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर समस्येबाबत पाठपुरावा करण्यात आला, मात्र अजूनपर्यंत वीज खांब लावण्यात आले नाही. ग्रामपंचायतीने नवीन वस्त्यांमध्ये पथदिवे लावावेत. अशी मागणी होत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रात्री बेरात्री नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे.
आरक्षित जागेवर दुसऱ्यांचाच कब्जा
अंबाजोगाई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना बसण्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. मात्र एसटी. बसमध्ये महिला बसण्यासाठी असलेल्या आरक्षणाचाच लाभ पुरुषच घेत असल्याने महिलांना अनेकवेळा उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.