दुभाजक सुशोभीकरण करण्याची मागणी
अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावर असलेल्या दुभाजकाची दुरुस्ती करून त्याला रंग देण्यात यावा. तसेच या दुभाजकांमध्ये येत्या पावसाळ्यात शोभित फुलांची झाडे लावल्यास शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. यासाठी नगरपालिकेने आतापासून नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.
प्रवासी निवाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी आमदार, खासदार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुतांश प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. काही निवाऱ्यांचा लोक चारा भरण्यासाठी, गुरे बांधण्यासाठी, चहा, पान दुकानाच्या व्यवसायासाठी वापर करीत आहेत. काही ठिकाणचे प्रवासी निवाऱ्याची पत्रे उडून पडझडही झाली आहे. संबंधित विभागाने सर्वेक्षण करून या प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे
नवीन वसाहतींमध्ये सुविधा मिळेनात
अंबाजोगाई : शहराच्या चारही बाजूने नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही वसाहती नगरपालिका, तर काही वसाहती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात. या वसाहतींमध्ये मुख्य समस्या रस्त्यांची असून, पावसाळ्यात रस्त्याअभावी ये-जा करण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. रस्त्यांबरोबरच वीज, पाणी, गटारी, आदी मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
अवघड वळणावर कठडे तुटले
धानोरा : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोराफाटा दरम्यान रस्त्याच्या वळणांवर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक कठडे तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संरक्षक कठडे तातडीने बांधावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मागील वर्षी या दोन्ही ठिकाणी अपघात घडले होते.