लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : माजलगाव धरण परिसरात मागील २४ तासांत ५६ मि. मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी पहाटे धरण पाणलोटात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात चांगल्याच पाण्याची वाढ झाली. चोवीस तासांपूर्वी धरणात ३५ टक्के पाणीसाठा होता. त्यात मंगळवारी दुपारी वाढ होऊन ५० टक्के झाला होता.
गेल्यावर्षी माजलगाव धरण परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरले होते. माजलगाव धरणात २ जून रोजी ४२७.६८ मीटर एवढा पाणीसाठा होता. सोमवारी सकाळी धरणात ४२८.७४ मीटर एवढा पाणीसाठा होता. यावेळी धरणात २५४ द.ल.घ.मी. एवढा एकूण पाणीसाठा होता तर ११२ द.ल.घ.मी. एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामुळे धरण ५५ टक्के भरले होते. धरण क्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी पहाटे जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. मंगळवारी दुपारी १२ वाजता धरणाची पाणी पातळी ४२९.१८ मीटर झाली. उपयुक्त साठा १५३ दलघमी तर एकूण पाणीसाठा २९५ दलघमी झाला. यामुळे धरण ५० टक्के भरले आहे, असे धरणाचे अभियंता बी.आर.शेख यांनी सांगितले. दरम्यान, धरणात ४७ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. माजलगाव तालुक्यात ५६ मि.मी.पावसाची नोंद झाली, असेही शेख यांनी सांगितले.
310821\purusttam karva_img-20210831-wa0029_14.jpg