दिंद्रुड येथील रंगनाथ हरिभाऊ साखरे (वय ७५) यांची धारुर तालुक्यातील देव दहिफळ शिवारात गट क्रमांक ५२ मध्ये शेती आहे. नेहमीप्रमाणे साखरे कुटुंबीय शेतात मशागत करत मजूर महिलांसमवेत शेतात खुरपणी करत असताना आरोपी सुनील बडे व दिलीप बडे यांनी फिर्यादी महिलेच्या नातेवाईकांच्या अंगावर वाईट उद्देशाने हात टाकला असता फिर्यादी महिला व पीडितेने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून त्यांचे सासू-सासरे धावत आले. आरोपींनी त्यांच्या हातातील कोयता, कुऱ्हाडीने महिलेच्या पाठीवर, अपंग शेतकऱ्याच्या हातावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. तसेच फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत भांडणात पडली असल्याची तक्रार फिर्यादी महिलेने दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणात फिर्यादी महिला, तिचा लहान मुलगा, जाऊ, वृद्ध सासू, अपंग सासरे सर्वांनाच आरोपींनी शेतातील जुन्या वादाची कुरापत काढून महिलांचा विनयभंग करत कुटुंबीयांना जीवे मारून टाकण्याच्या धमक्याही दिल्या असल्याची फिर्याद सदरील महिलेने दिंद्रुड ठाण्यात दिली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सुनील सुदाम बडे, दिलीप सुदाम बडे, ज्ञानोबा दौलत बडे, महेश ज्ञानोबा बडे, सुदाम शेषराव बडे व एक अनोळखी (सर्व राहणार देव दहिफळ) यांच्यावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पुढील तपास सपोनि प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार मायादेवी मस्के करीत आहेत.
रंगनाथ साखरे हे दिव्यांग असून शेतीच्या वादातून त्यांना बेदम मारहाण झाली होती. साखरे पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार पीडितांनी प्रहार संघटनेकडे केली. प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशनला दिव्यांग कायदा २०१६ प्रमाणे सदर गुन्हा दाखल करण्यासाठी आवाज उठवण्यात आला. यासाठी जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे, माजलगाव तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण,उपाध्यक्ष विकास काटकर यासह प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.
120721\sanotsh swami_img-20210712-wa0067_14.jpg