अंबेजोगाई : वराह चोरल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून काही व्यक्तींनी एका तरुणावर धारदार शास्त्रांच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी अंबेजोगाई शहरातील वडारवाडा भागात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोरांपैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
रवि अभिमान धोत्रे (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांचा वराहपालनाचा व्यवसाय आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, रविने पाळलेले वराह काही व्यक्तींनी चोरले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर, रविने त्यांचा घरी जाऊन जाब विचारला होता. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर, रवि घरी परतला. त्याच्या मागोमाग काही व्यक्ती दुचाकीवरून त्याच्या घराकडे आले. आम्ही वराह चोरले नसतानाही तुम्ही आमच्या लोकांना का बोलता, असे म्हणत त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. या वादात एकाने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने रविवर सपासप वार केले. दुपारच्या वेळेला पाऊस सुरू असल्या कारणाने बहुतेक जण घरातच असताना रस्त्यावर मात्र हा जीवघेणा प्रकार सुरू होता. रस्त्यावरचा हा प्रकार रवि धोत्रेच्या नातेवाइकांना समजल्यानंतर तेही घराबाहेर पडले. यावेळी पुन्हा मारामारीला सुरुवात झाली. या मारामारीत धोत्रे याला मारण्यासाठी आलेल्या लोकांपैकी दोघा जणांना जबर मार लागला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत माहिती कळताच, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे रविवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
संतप्त नातेवाइकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या :
दरम्यान, रविच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. संतप्त नातेवाइकांनी शवविच्छेदनही करू दिले नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याबाहेर नातेवाइकांची गर्दी होती.
आठ दिवसांची कन्या वडिलांच्या प्रेमाला पारखी
रवि धोत्रे यांना आठ दिवसांपूर्वीच कन्यारत प्राप्त झाले होते. मात्र, घरात आनंदाचे वातावरण असतानाच रविची हत्या झाली. रविच्या मृत्यूनंतर ही मुलगी वडिलांच्या प्रेमाला पारखी झाली आहे.