कडा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावांत संघटित होऊन स्वत:ची ताकद निर्माण करून पक्षाची ध्येयधोरणे तळगळापर्यंत रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रासपचे मराठवाडा प्रभारी नितीन धायगुडे यांनी केले.
कडा येथे शुक्रवारी आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकीत धायगुडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे मराठवाडा सरचिटणीस डाॅ. शिवाजी शेंडगे, जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, तालुकाध्यक्ष गंगा खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. धायगुडे म्हणाले, रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपा व इतर कुठल्याच पक्षाच्या पाठीमागे न धावता गावागावांत संघटित होऊन स्वत:ची ताकद निर्माण करणे काळाची गरज आहे. यापुढे जिल्हा परिषद असो की, पंचायत समिती, कुठल्याही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
डाॅ. शेंडगे म्हणाले, समाजातील उपेक्षितांना अपेक्षित स्थान मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक आहे. रासप नेते जानकर यांनी दुग्धविकासमंत्री असताना राज्यात पशूंची जनगणना केली. मात्र, केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही ओबीसींची जनगणना होत नसल्याची खंत आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संघटित होण्याची गरज आहे, असे सांगितले.
याप्रसंगी किरण तागड, रघुनाथ जगताप, नाथा वाघमोडे, धुळाजी लकडे, डाॅ. छगन दातीर, बाजीराव गोफणे, रफिक पठाण, राजेंद्र गावडे, अनिल देवकर, सय्यद ताजुद्दीन, भानुदास दातीर, दीपक देवकर, बाळासाहेब पारखे, राजू पालवे, सागर पारखे, महादेव पालवे, संतोष पारखे, राजू पालवे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक किरण तागड यांनी केले, सूत्रसंचालन अमर शेख यांनी तर आभार गंगा खेडकर यांनी मानले.
210821\img-20210819-wa0100_14.jpg
राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकीत रासपचे मराठवाडा प्रभारी नितीन धायगुडे, डॉ. शिवाजी शेंडगे यांचा पदाधिका-यांनी सत्कार केला.