बीड : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील २५ टक्के मोफत प्रवेश लटकलेलेच दिसत आहेत. प्रवेशासाठी आता पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यातील निवड झालेल्या बालकांची ११ जूनपासून प्रवेश प्रकिया सुरू झाली होती. १० जुलैपर्यंत जिल्ह्यात २०१२पैकी १०३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या आकड्यानुसार ५१.४६ टक्केच प्रवेश निश्चित झाले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे, त्यांनी २३ जुलै २०२१पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मोफत प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. धारूर तालुक्यात निकषपात्र ८ शाळांमध्ये सर्व १०० जागा रिक्त आहेत, तर माजलगावात १७ टक्के, अंबाजाेगाईत १८ टक्केच प्रवेश पूर्ण झाले आहेत. २३ जुलैपर्यंत मुदत असल्याने येत्या दहा दिवसांत किती प्रवेश निश्चित होतात, याकडे लक्ष लागले आहे.
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद -२३३
एकूण जागा -२,०१२
आतापर्यंत झालेले प्रवेश -१,०३६
रद्द झालेला अर्ज -१
शिल्लक जागा - ९७५ २) तालुकानिहाय शाळा आणि जागा
तालुका शाळा जागा शिल्लक जागा
अंबाजोगाई ३७ ३०१ २४६ आष्टी १४ ०३१ ०१७
बीड १८ १६१ ०४० धारूर ०८ १०० १०० गेवराई ३६ ३४६ १२८ केज २१ १७६ ०५६ माजलगाव २९ १९३ १६० परळी २९ ३०९ ११६ पाटोदा ०४ ०२० ००६ शिरूर १० ०६१ ०१० युआरसी बीड २० २५६ ०७२ वडवणी ०७ ०५८ ०२४ दुसऱ्यांदा मुदतवाढ
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. निवड झालेल्या बालकांना प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ११ व नंतर पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता २३ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.
शाळांचे पैसे सरकार कधी देणार?
आरटीई फी परतावा (प्रतिपूर्ती) शासनाकडे मोठ्या प्रमाणात थकला आहे. हा परतावा वेळेत न दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून सावरणे कठीण बनले आहे. व्यवस्थापनावर खूप ताण पडत आहे. शासनाने प्रतिपूर्ती रक्कम तातडीने देण्याची गरज आहे. - अमर भोसले, सचिव मेस्ट
पालकांच्या विविध अडचणी
गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन प्रवेश निश्चित होण्यास विलंब होऊ लागला. काही पालकांना उत्पन्नाचा दाखला अद्याप न मिळाल्याने प्रवेश थांबला आहे. काही नोकरदार पालकांच्या कार्यालयांची वेळ आणि शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची वेळ याचा मेळ बसत नसल्याने पालक पुरेशी कागदपत्रे जमा करू शकलेले नाहीत. त्यामुळे बालकांचे प्रवेश रखडले आहेत, तर काही शाळा पालकांना विविध त्रुटी काढून चकरा मारायला लावत आहेत.
विद्यार्थ्यांचे आधार अपडेट होताच प्रतिपूर्ती
आरटीई प्रवेश कमी होण्यामागे अनेक कारणांपैकी मागील फी थकलेली असणे, हे एक कारण असू शकते. संबंधित शाळांना त्यांची प्रतिपूर्ती लवकरच मिळणार आहे. फक्त विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.), बीड.