..........
हातपंप बंद असल्याने गैरसोय
बीड : तालुक्यातील जेबा पिंप्री व पालसिंगन येथील हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वेळोवेळी ग्रामस्थांकडून हातपंप दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. परंतु, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी हातपंप तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
............
बीड शहरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था
बीड : शहरात विविध ठिकाणी लघुशंकेसाठी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. मात्र, त्या सर्वच स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरात दुर्गंधी सुटत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
.................
कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
बीड : जिल्हा प्रशासनाकडून उद्योग व व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बाजरपेठेत मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. कोरोनासंदर्भातील नियम नागरिकांकडून पायदळी तुडवल्याचेदेखील दिसून येत आहे. त्यामुळे मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर पाळावे. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे.
..............
देवराईवरील झाडांची चांगली वाढ
बीड : शहराजवळील पालवनच्या डोंगरावर सह्याद्री देवराई प्रकल्प वनविभागाकडून उभारण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस जिल्ह्यात होत असल्यामुळे झाडांची वाढदेखील वाढली आहे. दरम्यान याठिकाणी पर्यटकांची व ट्रेकिंग करण्यासाठी नागरिकांची गर्दीदेखील वाढत आहे. यापैकी काही संघटनांकडूनदेखील निसर्ग संवर्धनासाठी वनविभागाच्या मदतीने विविध उपक्रम याठिकाणी राबवले जात आहेत.
.................