धारुर : खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर धारुर-तेलगाव रस्त्यावर अरणवाडी साठवण तलावाच्या जवळ आठ दिवसांपूर्वी केलेल्या कामाच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. थातुरमातुर काम करून आटोपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
धारुर ते तेलगाव या राष्ट्रीय महामार्गावर राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. धारुरच्या घाटाखाली अरणवाडी साठवण तलावाजवळ ५०० मीटर रस्त्याची उंची वाढविण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, हे काम योग्य प्रकारे न केल्याने आठ दिवसांपूर्वी या रस्त्यावर केलेल्या डांबरीकरणावर खड्डे पडत आहेत. हे काम राष्ट्रीय महामार्गाचे आहे की, एखाद्या ग्रामीण रस्त्याचे असा प्रश्न निर्माण होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन चांगल्या दर्जाचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
खड्डे बुजवून घेण्याचे आदेश
धारुर घाटाखालील रस्ता उंच करण्याच्या कामावर डांबरीकरणाच्या जागी खड्डे पडल्याचे समजले असून, संबंधित गुत्तेदाराला खड्डे बुजविण्याबाबत तत्काळ आदेश दिले आहेत. या डांबरीकरणावरील लेअर पावसाळ्यानंतरच करावा, असे गुत्तेदारास सांगितल्याचे एमएसआरडीचे कनिष्ठ अभियंता अतुल कोटेचा यांनी सांगितले.
130721\img-20210713-wa0107.jpg
आठ दिवसा पुर्वी डांबरीकरण झालेल्या धारूर तेलगाव राष्ट्रीय महामार्गा वर खड्डे