परळी : शहरातील बरकतनगर भागातील कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी अज्ञात आरोपींनी डांबून ठेवलेल्या १२ गाईंची सुटका करून त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. परळी येथील संभाजीनगर पोलिसांनी शहर ठाणे पोलिसांच्या मदतीने कत्तलखाना परिसरात ११ जुलैरोजी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
शहरातील रेल्वे पटरीजवळील बरकतनगर परिसरात अज्ञात आरोपींनी अवैध कत्तलखाना चालवून एका गोवंश बैलाची कत्तल करून १२ गाई कतलीसाठी डांबून ठेवल्याची फिर्याद सामाजिक कार्यकर्ते शिवराम दहिफळे (रा. अस्वलआंबा) यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावून ११ जुलैरोजी दुपारी बाराच्यासुमारास येथील कत्तलखाना परिसरात छापा मारला. तेथे १२ गाई पोलिसांना आढळून आल्या. परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर व संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी बाहेरगावच्या पोलिसांचीही मदत घेण्यात आली.
रामरक्षा गोशाळेत गाईंची देखभाल
पोलिसांनी केलेल्या कारवाईत लहान-मोठ्या १२ गाई पोलिसांना मिळून आल्या. त्यांची देखभाल करण्यासाठी परळी-अंबाजोगाई मार्गावरील रामरक्षा गोशाळेत पोलिसांनी ठेवल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा शोध घेणे चालू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांनी दिली.
120721\img-20210712-wa0337_14.jpg