लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ग्रामपंचायत निधीतून काम अशक्य
माजलगाव : तालुक्यातील उमरी गावातून कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले जाते; पण एक वर्षापासून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील उमरी या गावाची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे. या गावांतून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले जाते. आजपर्यंत आ. प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात येथील ग्रामपंचायत आहे. उमरी येथील बसथानक ते हनुमान मंदिर हा मुख्य रस्ता न झाल्याने या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार पाण्याचा अंदाज न आल्याने पडले आहेत. महिला, वृद्ध, विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून जावे लागत आहे. वेळोवेळी पाठीशी राहून मताधिक्य देणाऱ्या उमरी गावातील मुख्य रस्त्याचा प्रश्न आ. प्रकाश सोळंके यांनी मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
गावातील मुख्य रस्ता असल्याने या कामाला मोठा निधी लागत आहे. या कामाला ग्रामपंचायतमधून निधी खर्च करणे शक्य होत नाही. तरी लोकप्रतिनिधींनी मुख्य रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रश्न मार्गी लावावा.
-वैजनाथ घायतिडक,
ग्रामपंचायत सदस्य, उमरी.
170721\5027purusttam karva_img-20210717-wa0046_14.jpg