माजलगाव : येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे माजलगाव उपविभागात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. पाहिजे तसा पाऊस नसल्याने पिकांना पाणी देण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकरी तर उखाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वीज वितरण कंपनीच्या माजलगाव उपविभागात माजलगाव शहरासह ९० गावे, वस्ती, तांडे येतात. या उपविभागात वीज बिल भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मागील अनेक वर्षांपासून माजलगाव शहरात लोडशेडिंग बंद आहे. परंतु, मागील एक दीड वर्षाच्या कार्यकाळात कोरोनामुळे वीज बिल भरणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती.
उन्हाळ्यातही या ठिकाणचा वीज पुरवठा क्वचित खंडित झाल्याने नागरिकांना उन्हाळा जाणवला नाही. एक महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात झाली. चार थेंबही आले की, दिवस दिवस वीज पुरवठा खंडित होत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने व शेतात ऊस उभा असल्याने तसेच खरिपाचा पेरा शेतकऱ्यांनी केल्याने व पाऊस पाहिजे तसा नसल्याने शेतकऱ्यांवर पिकाला पाणी देण्याची वेळ आली आहे. पाहिजे तसा पाऊस नसल्याने सध्या वातावरणात उकाडादेखील वाढला आहे. यातच डासांचा उपद्रव वाढला आहे.
माजलगाव शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार बंद होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः या उकाड्यामुळे वृद्ध व बालक जास्त त्रस्त झाले आहेत. परंतु येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार होत असलेला बिघाड वेळेत निघत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
----
या महिन्यात वारंवार हवा व पाऊस येत असल्यामुळे वारंवार तारा तुटणे व इतर बिघाड होत आहेत. त्यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या ते सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
-- सी. एम. चौधरी, कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी माजलगाव शहर