बीड : येत्या १५ जुलैपासून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. ग्रामपंचायतींनी ठराव करून दिलेल्या निकषांच्या आधारे ८ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ग्रामपंचायतींनी ठराव करावा, असे सूचित केले असलेतरी जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीने तसा ठराव करून प्रशासनाकडे पाठविलेला नाही. तरीही ६८९ शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
शाळा सुरू करण्यासाठी सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची समिती गठित करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. ग्रामपंचायत आणि पालकांनी ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकाही शाळेकडून तशी ‘ना हरकत’ मिळालेली नाही. जिल्ह्यात ७४७ गावे सध्या कोरोनामुक्त आहेत. मात्र गावात ८ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’ची गरज आहे. त्यानंतरच शाळांची घंटा वाजणार आहे.
अशा आहेत सूचना
शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित गावात कोविड रूग्ण आढळून आलेला नसावा.शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याबरोबरच सीइओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा. गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये, एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूटाचे अंतर ठेवावे, एका वर्गात १५- २० विद्यार्थी असावेत, साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी किंवा त्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील एकूण शाळा - ३६८६
जिल्हा परिषद शाळा -२४९१
अनुदानित शाळा - ७४९
विनाअनुदानित शाळा - ४३७
एकूण गावे - १०७३
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे - ७४७
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
वडवणी १९, अंबाजोगाई ८१, बीड १८०, गेवराई ७७, आष्टी ४७, पाटोदा ३९, शिरूर ०, माजलगाव ७१, धारूर ५१, केज १०५, परळी ७७ , एकूण ७४७
---------
आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतींचा ठराव नाही
गावात शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतींनी पालकांशी चर्चा करून ठराव द्यावयाचे आहेत. मात्र अद्याप एकही ठराव शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही. माध्यमिक विभागाचे शिक्षणधिकारी डॉ. विक्रम सारूक यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कोविडमुक्त ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या ठरावाने ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत कार्यवाही करून अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
६८९ शाळा तयार
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील ६८९ शाळांकडून तयारी केली जात आहे. ६८९ शाळा तयार असल्यातरी तेथील पालकांची बैठक घेऊन ग्रामपंचायतींनी अद्याप ठराव केलेले नाहीत. येत्या काही दिवसात ठराव होऊन शाळा सुरू होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
पालकांचीही हा
आजच्या परिस्थितीत शाळा सुरू होणे आवश्यक आहे. मुलांचे दीड वर्ष वाया गेले आहे. घरी ते अभ्यास करीत नाहीत. ऑनलाइन शिक्षण अुनही नसल्यासारखेच आहे. कोरोनाचे नियम पालन करून शाळा सुरू करण्यास हरकत नाही. - कमलाकर काटे, पालक , पिंपळनेर, ता. बीड.
--------------
माजी दोन मुले शिक्षण घेत आहेत. जवळपास दोन वर्ष होत आले. कोरोनाची लाट पुरती ओसरली आहे. नियम पाळून शाळा सुरू करावी, शिक्षकांनी कोरोना चाचणी करून यावे. शाळा सुरू होणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. - सिद्धेश्वर नरवड, पालक, पिंपळनेर, ता. बीड.
------------
जिल्ह्यात ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या एकूण ७५२ शाळा आहेत. पैकी १५ जुलै रोजी ६८९ शाळा सुरू होऊ शकतात. शाळा सुरू करण्याबाबत पालकांच्या प्रतिक्रिया राज्य शिक्षण विभागाकडून घेतल्या आहेत. त्यात ८० टक्के पालकांनी शाळा सुरू करणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.) बीड.
-------