अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्ता म्हणून ओळखला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून हा रस्ता रहदारीस योग्य करून द्यावा, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, प्रामुख्याने शहरात प्रवेश करण्यासाठीचा हा मुख्य रस्ता आहे. परंतु, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. अवजड वाहनधारकांसह शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा, अशी मागणीही मुंदडा यांनी निवदेनाद्वारे केली आहे.