लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : गेल्या दोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आले आहे. ऑनलाइन शिक्षणातून आपले भविष्य घडवण्यासाठी चाललेली धडपड केविलवाणी वाटत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वीज, इंटरनेट रेंजच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये विविध समस्यांचा डोंगर विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर होणारा विजेचा लपंडाव, टाॅवरअभावी इंटरनेटच्या रेंजच्या समस्येने विद्यार्थी त्रस्त आहेत. तरीही शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, प्राध्यापक बांधव ऑनलाइन शिक्षण अत्यंत प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न गेल्या अनेक महिन्यांपासून करीत आहेत. त्याला विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्यात अनेक अडथळे येत आहेत.