गेवराई : बीड जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगड गडाच्या वतीने गड परिसरात गोवंश संवर्धनाचे काम होत आहे. निसर्गरम्य क्षेत्र असल्याने येथे विविध पक्ष्यांची वाढती संख्या पाहता गडाचे मठाधिपती महंत हभप शिवाजी महाराज हेदेखील आवर्जून पक्ष्यांना नित्यनियमाने दाणापाणी घालत आहेत. संत तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती’चा प्रत्यय इथे पाहायला मिळतो.
बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगड डोंगराच्या माथ्यावर वसलेले आध्यामिक गड संस्थान आहे. गडाला हजारो एकर क्षेत्र लाभलेले असून, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या हिरवाईने नटलेल्या गडावर मोठ्या प्रमाणावर गोवंश अर्थात देशी गायी, बैलांचे पालन करण्यात येत आहे. यातून भारतीय संस्कृती जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गडावर विविध प्रकारची झाडे, वेली, वृक्षराजी आहे. निसर्गरम्य परिसर असल्याने येथे मोर, कबुतर, पारवे, तसेच विविध प्रकारच्या चिमण्या, कावळे आदी विविध पक्ष्यांची वाढ झाली आहे. या पक्ष्यांची संख्या पाहता मठाधिपती महंत हभप शिवाजी महाराज हे आवर्जून पक्ष्यांना रोज धान्य खायला घातल्याशिवाय देवपूजा करत नाहीत. पशू-पक्ष्यांशी सोयरीक जोडणारे ते पर्यावरणवादी ठरत असून, डोंगरावरील झाडांशी व पशू-पक्ष्यांशी निसर्गाच्या सहवासात एकांतवासात जे परमसुख मिळते ते सर्वोच्च आनंद उत्साह देणारे आहे, असे मठाधिपती महंत शिवाजी महाराज म्हणाले.
260821\sakharam shinde_img-20210825-wa0052_14.jpg