गेवराई : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून राजरोस सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाईसाठी २५ ऑगस्ट रोजी रात्री जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक आर. राजा हे रस्त्यावर उतरले. राक्षसभुवन येथे नदीपात्रात मोठ्या फौजफाट्यासह त्यांनी छापा टाकला. यावेळी सात हायवा पकडण्यात आल्या. लोकेशनवरील जीपही ताब्यात घेतली.
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. वारंवार कारवाया करूनही माफियांचा उपद्रव सुरूच आहे. याविरुद्ध नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कंबर कसली आहे. २५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सोबत घेऊन मध्यरात्री त्यांनी राक्षसभुवन नदीपात्रात छापा टाकला. यावेळी सात हायवा पकडण्यात आल्या. दरम्यान, अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांना लोकेशन देणारी एक जीपही ताब्यात घेतली. जीपचालकावर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, तर अवैध वाळूची सात वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. तहसीलदार सचिन खाडे , पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्यासह मंडळाधिकारी, तलाठ्यांसह पोलिसांची मोठी कुमक कारवाईत सहभागी होती.