वडवणी : शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या इमारतीत वाहतूक नियंत्रक कक्ष चालतो. या परिसरात सार्वजनिक मुतारी, स्वच्छतागृह नसल्याने लोक उघड्यावर विधी उरकतात. स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ करण्याची प्रवाशांनी मागणी केली आहे.
वाळलेल्या झाडांचा धोका वाढला
धारुर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. ही झाडे मागील काही वर्षांपासून वाळत चालली आहेत. जोरदार वारा सुटल्यास झाड पडण्याचा धोका आहे. त्यामुळे तलावाच्या काठावरील वाळलेली जुनी झाडे काढण्याची गरज आहे.
नाली सफाईची कामे रखडली
वडवणी : शहरातील मुख्य रस्त्याच्या व पोलीस ठाण्याच्या मागच्या प्रभागात नाली सफाईची कामे रखडली असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी नाली बुजली गेल्याने दुर्गंधीचे पाणी रस्त्यावर उतरले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तत्काळ नगरपंचायतीने नाल्या साफ करून दुर्गंधी हटविण्याची मागणी व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी यांनी केली आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे
शिरुर कासार : कोरानाचा धोका संपूर्णतः कमी झाला नसल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रत्येकाने स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
शेतात, घरासमोर होतात विवाह सोहळे
माजलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय व मंदिराऐवजी शेतास पसंती दिली जात आहे. बहुतांश विवाह सोहळे शेतात होताना दिसत आहेत. साध्या पद्धतीने शेतात छोटासा मंडप टाकून विवाह होत आहेत. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे. मोजक्याच नातेवाईक, आप्तेष्टांच्या उपस्थितीत विवाह होत आहेत.