लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : येथील घाटात अरुंद रस्ता असल्याने अपघाताची मालिका रोज सुरू असून, गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास साखर घेऊन परभणीकडे जाणारा ट्रक उलटल्याने चालक जखमी झाला, तर ट्रकचे मोठे नुकसान झाले.
धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना आहे त्याच रस्त्याचे काम फक्त चकचकीत डांबरीकरण करून करण्यात आले. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली व सुरक्षा कठडे रस्त्याच्या बरोबरीला आल्याने बाजूला असणारी मोठी दरी वाहनांसाठी धोकादायक झाली. रस्त्याची रुंदी कमी असल्याने घाट हा वाहनांसाठी धोकादायक झाला. त्यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. दरम्यान, गुरुवारी सकाळी टेंभुर्णी येथील विठ्ठल साखर कारखान्यातून साखरेचे पोते भरून ट्रक (क्र.एमएच २२, एल ००३२) परभणीकडे जात होता. दरम्यान, घाटात अवघड वळणावर समोरून येणाऱ्या बसच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या एका बाजूला घेत असताना ट्रक उलटला. त्यामुळे साखरेचे पोते रस्त्यावर पडले. या अपघातात ट्रकचालक अशोक सुरवसे हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले, तर ट्रकमधील साखर तात्काळ दुसऱ्या वाहनात सुरक्षित हलविण्यात आली. या अपघाताची धारूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. ए.एस.आय. गोंविद बास्टे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
150721\1730-img-20210715-wa0089.jpg
धारूर घाटात अपघाताची मालीका थांबेना