गेवराई : शासनाने निर्गमित केलेले २४ ऑक्टोबर २०१७ चे परिपत्रक रद्द करुन बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत येत्या २० मार्चपर्यंत समाविष्ट न केल्यास २२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने दिला आहे.
बंद पडलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करणेबाबतचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु शाळा बंद केल्यानंतर या संस्थेने पुन्हा संधी मिळण्याबाबत शासनाकडे अपील केले. या शाळेतील कर्मचाऱ्यांचे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करू येऊ नये, असे शासनाचे परिपत्रक आहे. हे शासन परिपत्रक रद्द करून आयुक्तालय स्तरावरून बंद करण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत आयुक्त, लोकप्रतिनिधी, संघटनांनी निवेदन व पत्राद्वारे विनंती केली आहे.
दिव्यांग शाळा बंद होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असून, या बंद केलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. २४ ऑक्टोबर २०१७ चे शासन परिपत्रक रद्द करून राज्यातील बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचा समायोजनेचा मार्ग मोकळा करावा नसता २२ मार्चपासून विशेष शाळा कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर संघटना बीड व बीड जिल्ह्यांतील बंद पडलेल्या दिव्यांगांच्या शाळेतील सर्व कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.