ही स्थिती तालुक्यात नव्हे तर सगळीकडे असू शकते, कारण ज्या संकेतस्थळावर हा विमा काढला जातो त्या संकेतस्थळाची गती सध्या मंदावली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व अन्य रोगांमुळे पिकांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांना मदत म्हणून सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मदतसुद्धा झाली आहे.
खरीप हंगाम सुरू होताच शेतकरी वर्ग आपल्या शेतात पेरलेल्या पिकांचे विमा संरक्षण करण्याकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत विमा काढतात. सन २०२१-२२ या चालू हंगामाकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत पिकांचे विमा काढण्याकरिता शेतकरी ऑनलाइन केंद्रांना भेट देत आहे, परंतु त्या ठिकाणी सर्व्हर काम करीत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. दिवसभरात मोठ्या मुश्किलीने हे एक ते दोन फॉर्म यशस्वीरीत्या फिलअप होतात. वरूनच प्रॉब्लेम असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले असतानासुद्धा ते फॉर्म फिलअप करता येत नाहीत. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. तसेच २३ जुलै ही पीकविमा भरण्याची अंतिम तारीख असून, अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही पीकविमा भरला नसल्याने त्यांना पीकविमा भरण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.
पीकविमा भरण्याची तारीख वाढली
तालुक्यातील शेकडो शेतकरी विविध अडचणींमुळे पीकविमा काढू शकले नाहीत. दि. १५ जुलै शेवटची तारीख होती. मात्र शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत आता दि. २३ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा व पिकांना संरक्षण प्राप्त करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.