आष्टी : पीक विमा भरण्याची मोहीम सध्या वेगाने सुरू असून, अवघे दोन दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घेण्याचे आवाहन मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने संगणक परिचालक (आपरेटर) नियुक्त केलेले आहे. त्याला शासन विशिष्ट मानधन देत आहे. वर्षानुवर्षे त्यात वाढ होत आहे. ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकाकडून पीक विमा मोफत किंवा १० रुपये नाममात्र देऊन भरला जातो. शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला सीएससी आयडी दिलेली आहे. तो नेमका कोण वापरतो, हेसुद्धा बघितले पाहिजे.
गावातील ऑनलाईनचे काम मोफत करणे, हे ऑपरेटरचे काम आहे. अनेक गावांत हा उपक्रम चालू आहे. आपल्या गावात तो चालतो का ? तरी सर्व गावकऱ्यांनी बाहेर पैसे खर्च न करता, ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपला पीक विमा भरून घ्यावा.
जिथे ग्रामपंचायत ऑपरेटर हा पीकविमा ऑनलाईन करून देत नसेल, तर त्याची तक्रार ग्रामसेवक किंवा पंचायत समितीकडे करावी. तसेच सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी यावर लक्ष ठेवावे. अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वांनी पीक विमा भरून घ्यावा, असे आवाहन दरेकर यांनी केले आहे.