कडा : तालुक्यात जून ते जुलै आजपर्यंत एकाही विवाहाला परवानगी नसताना लग्नाचे बार उडत आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी होत असताना वीकेंड लाॅकडाऊन करून रुग्णसंख्या वाढू नये यासाठीच खबरदारी घेण्याचे काम प्रशासन करत असल्याचा डांगोरा पिटवला जात असला तरी सत्य मात्र वेगळेच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विवाह समारंभासाठी ५० लोकांना परवानगी दिली. त्यात वधू-वरांसह उपस्थित राहणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी बंधनकारक केली. विवाह समारंभ करा; पण पन्नास लोकांची उपस्थिती, त्यांची कोरोना चाचणी, पोलीस ठाण्यातून रितसर परवानगी, सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आदेश असताना मात्र याच नियमाला आष्टी तालुक्यात हरताळ फासला जात आहे. विनापरवानगी शुभमंगल सावधान मात्र धूमधडाक्यात सुरू आहे. कोरोना चाचणी, परवानगीशिवाय होणाऱ्या लग्नांसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केली आहे.
लपवाछपवी कशासाठी?
जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश डावलून आजवर अनेकांनी परवानगीशिवाय लग्नाचे बार उडवले आहेत. मग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामस्तरावरील समित्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती का दिली नाही, लपवाछपवी का केली आणि अधिकाऱ्यांना उघड्या डोळ्यांनी ते का दिसले नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परवानगीसाठी कोणी आलेच नाही
आष्टी पोलीस ठाण्यात विवाह समारंभ करण्यासाठी दीड महिन्याच्या कालावधीत एकही परवानगी दिली गेली नाही, कोणी आले नाही तर अंभोरा पोलीस ठाण्यातदेखील एकही परवानगी घेऊन विवाह झाला नाही, की अशी परवानगी घ्यायला कोणी आले नाही.
परवानगीशिवाय विवाह होत असतील तर अशा ठिकाणची माहिती घेऊन स्थानिक कर्मचारी तलाठी, मंडळ अधिकारी यांना पाठवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सुशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी, आष्टी
तालुक्यात कोरोना आकडा जिल्ह्यापेक्षा मोठा आहे. लोकांनी विवाह समारंभात गर्दी जमवली आणि परवानगी नसेल तर जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल.
- विजय लगारे, पोलीस उपअधीक्षक, आष्टी.
तालुक्यातील नववधू-वरांनी विवाहाआधी येऊन अपवादवगळता आजपर्यंत कोरोना चाचणी केली नाही. लग्नसमारंभाच्या अनुषंगाने पन्नास लोकांचीदेखील कोरोना चाचणी केली नाही.
- डॉ.नितीन मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, आष्टी