बीड : डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रविवारी सकाळीच एका मातेचा नॉर्मल प्रसूतीनंतर मृत्यू झाला होता. याची चौकशी सुरू असतानाच सोमवारी सकाळी आणखी एका मातेची प्राणज्योत मालवली. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रूग्णालयात चाललंय काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान आठवड्यातील हा तिसरा माता मृत्यू आहे.
रूक्मीन परशुराम टोणे (वय ३५ रा.पांगरबावडी ता.जि.बीड) असे मयत मातेचे नाव आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी १०:१३ वाजता रूक्मीन या जिल्हा रूग्णालयात ॲडमिट झाल्या होत्या. त्यानंतर लगेच सकाळी ११:४० वाजता त्यांचे सिझर झाले. त्यांनी २३०० ग्राम वजणाच्या मुलाला जन्म दिला. ही त्यांच चौथी प्रसूती होती. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होती. १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:२५ मिनीटांनी त्यांचा उपचार सुरू असतनाच मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रूग्णालयात करण्यात आले. रूक्मीन यांना आगोदरच ह्रदयासह इतर आजार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ॲडमिट होताच रेफरचा सल्लाही दिला होता, परंतू ते गेले नाहीत. मृत्यूनंतर नातेवाईकांचा काही आरोप नसल्याचेही सांगण्यात आले.
अशोक थोरातांना परत बोलवा
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात असताना जिल्हा रूग्णालयासह सर्वच शासकीय रूग्णालयातील प्रसूतीचा टक्का वाढला. परंतू त्यांचे निलंबन होताच शासकीय आरोग्य सेवेला ग्रहण लागले आहे. आठवड्यात तीन मातांचे मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. यात एका मातेच्या मृत्यूमध्ये डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा आरोप आहे. असे आरोप टाळण्यासाठी आणि तत्पर सेवेसाठी डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन रद्द करून त्यांना परत त्याच पदावर आणावे, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.