अविनाश मुडेगावकर /
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : ग्रामीण भागात खेड्यापाड्यांत कुपोषण वाढत असताना शहरी भागात मात्र अतिपोषण ही समस्या निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. टीव्ही आणि मोबाइलमध्येच मुलांचा खूप वेळ जातो. दिवसभर घरी असल्याने सतत जंक फूड, चॉकलेट, थंड पेये, वेफर्स, असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, मैदानी खेळ बंद असल्याने व्यायाम थांबला आहे. त्यामुळे लहान मुलांमधील स्थूलता चिंतेचा विषय बनला आहे.
स्थूलतेमुळे लहान वयातच मुलांमध्ये अतिरिक्त उष्मांक, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: ८ ते १५ या वयोगटातील मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण जास्त असते.
आहारातून शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. पोषक तत्त्वे कमी प्रमाणात किंवा अतिप्रमाणात मिळाल्यास त्याचा परिणाम शरीराच्या वाढीवर होतो. त्यामुळेच मुलांमध्ये कुपोषण किंवा अतिपोषण होते.
...
स्थूलता ही नवी शहरी समस्या
शहरातील कुटुंबांमध्ये बरेचदा आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतात. आर्थिक सुबत्ता असल्याने मुलांचे सर्व हट्ट पालकांकडून पूर्ण केले जातात.
मॅगी, चिप्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, पास्ता, असे नानाविध पदार्थ हॉटेलमधून ऑर्डर करण्याची क्रेझ लॉकडाऊन काळात बरीच वाढली आहे.
..
पालेभाज्या, फळे पाहून मुले नाक मुरडतात. मुले पूर्ण वेळ घरात असल्याने त्यांचा वेळ चांगला जावा, म्हणून पालक त्यांचे खाण्या-पिण्याचे सर्व हट्ट पुरवतात. त्याची परिणती मुलांचे वजन वाढण्यात होत आहे.
...
पोषक घटक हवेत
मुलांची उंची, वय, वजन यानुसार शरीराची पोषक घटकांची गरज ठरते. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते.
पदार्थांमध्ये रंग, रूप, चवीचे वैविध्य राखल्यास मुले आवडीने पौष्टिक अन्न खातात.
...