अंबाजोगाई : येथील दूरदर्शन केंद्रात सर्व सोयी, सुविधा असतानाही त्या ठिकाणी आकाशवाणीचे एफ. एम. केंद्र का सुरू केले जात नाही. शहरातील नागरिकांनी अनेकवेळा मागणी करूनही केंद्र सरकारकडून याकडे का दुर्लक्ष होत आहे, असा प्रश्न तालुक्यातील रेडिओ श्रोत्यांसह स्थानिक कलाकारांनी उपस्थित केला आहे.
अंबाजोगाई परिसरात आकाशवाणीचे कुठलेच केंद्र व्यवस्थित चालत नाही. बीड व उस्मानाबाद केंद्राच्या लहरी अंबाजोगाईपर्यंत कार्यरत राहात नाहीत. त्यामुळे अंबाजोगाईला हे स्वतंत्र आकाशवाणीचे एफएम केंद्र सुरू झाले, तर अंबाजोगाईसह परळी, केज, कळंब, धारूर, अहमदपूर यांसह विविध तालुक्यातील नागरिकांना याचा फायदा होईल. येथील टॉवर १५० मीटर उंचीचे असल्याने याचा अनेक गावांना फायदा होऊ शकतो. या भागातील संगीत, नाट्य, सांस्कृतिक यासह इतर क्षेत्रातील कलावंत, वक्ते, कवींच्या प्रतिभेला वाव मिळेल.
केंद्रासाठी कमी खर्च
अंबाजोगाईला पूर्वीचेच उच्चशक्तीचे दूरदर्शन केंद्र कार्यरत आहे. त्यात टाॅवरसह आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आकाशवाणी केंद्र उभारणीसाठी फक्त ट्रान्समीटर, अँटिना व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आले तर हे केंद्र इथे कार्यरत होऊ शकते. त्यामुळे शासनाला कमी खर्चात हे केंद्र येथे कार्यरत करता येईल.
ग्राहक पंचायतीची मागणी
येथे एफएम केंद्र सुरू करावे, अशी मागणी विविध संघटना व नागरिकांनी केली. परंतु याकडे वेळोवेळी शासनाचे दुर्लक्षच झाले. मागील महिन्यात येथील ग्राहक पंचायतीनेही येथे आकाशवाणीचे एफएम केंद्र सुरू करावे, अशी मागणी केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.
ग्राहक पंचायतीचे विभागीय संघटक जनार्दन मुंडे, अध्यक्ष पी. एन. चव्हाण, संघटक दिनकर पसारकर यांनी ही मागणी केली आहे. जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही हे निवेदन पाठवले आहे.