दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील साखरे कुटुंबाची देवदहिफळ शिवारात शेतजमीन आहे. शेतीच्या वादातून साखरे कुटुंबास देवदहिफळ येथील शेतात मारहाण झाल्याची घटना ११ जुलैरोजी घडली होती. या घटनेत विनयभंग व मारहाणीचे दखलपात्र गुन्हे दिंद्रुड पोलिसात दाखल आहेत. शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी या प्रकरणाची दखल घेत बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना पीडित कुटुंबाची भेट घेण्याची सूचना दिली होती. या सूचनेवरून आप्पासाहेब जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी पीडित कुटुंबाची भेट घेत धीर दिला.
पीडित कुटुंबाच्या बाजूने शिवसेना व सरकार असून, आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे याप्रसंगी जाधव यांनी साखरे कुटुंबांना सांगितले.
रविवारी दुपारी साखरे कुटुंबीय शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी सुनील बडे व दिलीप बडे यांनी महिलांच्या अंगावर वाईट हेतूने हात टाकला होता. पीडित महिलेने आरडाओरडा केल्याचा आवाज ऐकून त्यांचे सासू-सासरे तेथे धावत गेले. आरोपींनी त्यांच्या हातातील कोयता कुऱ्हाडीच्या साह्याने महिलेच्या पाठीवर व दिव्यांग शेतकऱ्याच्या हातावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले असल्याची फिर्यादी महिलेने दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिली आहे.
आरोपी सुनील सुदाम बडे, दिलीप सुदाम बडे, ज्ञानोबा दौलत बडे, महेश ज्ञानोबा बडे, सुदाम शेषराव बडे व अन्य एक (सर्व राहणार देवदहिफळ) यांच्यावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाला दोन दिवस उलटून गेले आहेत, तरी या घटनेतील सर्व आरोपी फरार आहेत. याउलट दिंद्रुड पोलिसात पीडित कुटुंबावरच जाचक कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा निषेध म्हणून शिवसेनेच्यावतीने गावातून रॅली काढत दिंद्रुड पोलिसांचा निषेध व्यक्त करण्यात आला. दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सपोनि प्रभा पुंडगे यांची शिवसेनाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी भेट घेत झालेल्या प्रकारात योग्य तो न्याय देण्याची मागणी दिंद्रुड पोलिसांना केली.
साखरे कुटुंबाला झालेली मारहाण ही निंदनीय असून, याबाबत शिवसेना पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. पीडित कुटुंबावर झालेला अन्याय व पोलिसांनी केलेल्या चुकीच्या दाखल गुन्ह्याबाबत आम्ही बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार असून, गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार आहोत. या घटनेचा सर्व अहवाल आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून साखरे कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- आप्पासाहेब जाधव, शिवसेना बीड जिल्हाप्रमुख
आरोपींना पकडा, पीडितांना त्रास नको
बीड जिल्ह्यामध्ये एका शेतकरी महिलेवर जमिनीच्या वादावरून तिच्याकडे वाईट दृष्टीने बघायचे आणि तिच्याकडून विषय सुखाची मागणी करण्याचा अत्यंत निंदनीय असा प्रकार घडलेला आहे. यासंदर्भात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले आहे. यातील दोन्ही आरोपी पोलीस असून, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. या आरोपींना पकडण्याबरोबरच त्यांच्या बाकीच्या नातेवाईकांनी त्रास देऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. यासंदर्भात मी पोलीस अधीक्षकांशीही बोलणार आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
130721\2523img_20210713_174023_14.jpg