कासारी गावाजवळील कडा कारखान्याजवळ नेकनूरकडून पिंपरी चिंचवडकडे मालवाहू रिक्षा (क्र. एम.एच. १४ एच.जी. ०३८४) जात हाेता. तर आष्टी येथून आपल्या सराटेवडगावकडे रुक्मिणी संतोष बोडखे (४०) या मुलगा प्रवीण बोडखे (१८) सोबत दुचाकीने जात होत्या. दरम्यान मालवाहू रिक्षाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात रुक्मिणी संतोष बोडखे या जागीच ठार झाल्या, तर मुलगा प्रवीण गंभीर जखमी झाला असून आष्टी येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती कळताच सरपंच राम धुमाळ, उपसरपंच नवनाथ जाधव, युवराज धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मयत रुख्मिणी बोडखे यांच्या पार्थिवावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सराटेवडगाव येथील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. अपघातप्रकरणी राजू मच्छिंद्र बोडखे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात कलम २७९, ३३८, ३०४ अ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेत सहायक पोलीस उपनिरीक्षक एन.वाय. धनवडे, पोना. सिरसाठ यांनी पंचनामा करून पुढील तपास पो.काॅ. अनिल सुंबरे करत आहेत.