धारूर : भरधाव ट्रकने महिलेला चिरडल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान बीड - परळी रस्त्यावर तेलगाव येथे घडली. रत्नमाला लक्ष्मण तिडके (३५, रा. कासारी बाेडखा) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
तालुक्यातील तेलगाव हे चौफाळ्याचे तसेच परिसरातील काही गावांसाठी बाजारपेठेचे ठिकाण आहे. येथून जवळच असलेल्या कासारी बोडखा येथील गावकरी नेहमीच तेलगाव येथे खरेदीसाठी येत असतात. गुरुवारी बोडखा येथील लक्ष्मण तिडके त्यांची पत्नी रत्नमाला यांच्यासह तेलगावला आले होते. बीड - परळी रस्त्यावर महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एका मालवाहू ट्रक क्रमांक (एमएच ४० एके ११९१)ने तिडके यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यावेळी दुचाकीवरून खाली पडलेल्या रत्नमाला या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्या. दहा टायर असलेल्या ट्रकची चाके अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघात होताच ट्रकचालक फरार झाला असून, क्लिनरला लोकांनी पकडले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दिंद्रूड पोलीस ठाण्यात या अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.