Chaitra Varuthini Ekadashi April 2025: हिंदू नववर्ष सुरू झाले असून, अनेकार्थाने शुभ मानला गेलेला चैत्र महिना सुरू आहे. काही दिवसांनी चैत्र महिन्यांची सांगता होणार आहे. तत्पूर्वी चैत्र वद्य एकादशीला वरुथिनी एकादशीचे व्रत आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. वरुथिनी एकादशीचे व्रत पूजन कसे करावे? जाणून घेऊया...
वरुथिनी एकादशी गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी आहे. बुधवार, २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ०४ वाजून ४३ मिनिटांनी चैत्र वद्य एकादशी सुरू होत असून, गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०२ वाजून ३२ मिनिटांनी वद्य एकादशी तिथीची सांगता होत आहे. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे चैत्र वद्य वरुथिनी एकादशीचे व्रत गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी करावे, असे सांगितले जाते.
वरुथिनी एकादशी व्रतपूजन कसे करावे?
वरुथिनी एकादशी व्रताचरण आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे.
वरुथिनी एकादशी व्रताची सांगता कशी करावी?
एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.