>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आजकाल प्रत्येकाच्या ओठी गुरु हे नाव येतेच येते . कलियुगात संकटे गळ्यापर्यंत आली की मनुष्य कुठल्यातरी शक्तीचा आधार घेतो आणि त्यास शरण जाऊन नतमस्तक होतो . आजच्या इन्स्टंटच्या जमान्यात प्रत्येकाचा संयम संपलेला आहे किंवा संपत चाललेला आहे. पुढील गाडी सिग्नलला दोन क्षण उभी राहिली की मागून सगळ्यांचे होर्न चालू होतात. सगळे मनात आले की लगेच व्हावे असे होत नसते. विवाहासाठी स्थळ शोधायला सुरवात केली की जेव्हा काही काळ लोटतो आणि विवाह जमत नाही तेव्हा मुलांचाच काय पालकांचाही संयम सुटतो आणि त्याचे काळजीत रुपांतर होते . आपल्या अपत्याचा विवाह होणार की नाही ही एक अनामिक भीती मनाला ग्रासू लागते . आपण देवी देवता नाही आपला संयम सुटणे हे विशेष नाही. तरी संयम हवा आणि संयमाचा उगम हा नामातून होत असतो. आजकाल एक सर्वसाधारण प्रश्न विचारला जातो की साधना कशी करावी ह्यासाठी मार्गदर्शन करा. खरे सांगू का ? हे प्रश्न न मी कधी कुणाला विचारले आणि कुणी विचारावे असेही वाटत नाही. अनेकदा आपण हे करू का ते करू ह्यात गुंतून राहतो. सगळ्यात प्रथम त्यातून बाहेर यावे. सकाळी आपले प्रातःविधी उरकले की देव्हाऱ्यातील आपल्या कुलस्वामिनीला हळद कुंकू वाहून दिवसाची सुरवात करावी . मनोभावे नमस्कार करून देवीचा जप , श्रीसूक्त जे काही म्हणता येईल ते म्हणावे. आपल्या कुलस्वामिनीची उपासना केल्या नंतरच पुढील उपासना जसे इष्ट गुरूंचा जप, पोथी वाचन करावे.
जे काही करू त्यात बदल नको, जे करू ते आत्मिक समाधानाची अनुभूती देणारे असले पाहिजे. आज साईबाबा, उद्या शंकर महाराज असे गुरु बदलू नयेत. गुरुतत्व समजणे महत्वाचे आहेत . प्रत्येक मुलाची आई वेगळी असते, पण तिची शिकवण एकच असते! त्याप्रमाणे गुरूंची नावे वेगवेगळी असली तरी गुरु हे एक तत्व आहे. माणसातील देव ओळखून त्याच्यासमोर नतमस्तक व्हा हेच ते सांगत असते. आपण आपल्या कुवतीप्रमाणे त्यांची सेवा करावी. कुठल्याही अपेक्षेविरहित आत्यंतिक ओढीने प्रेमाने घेतलेले त्यांचे नाव निश्चित त्यांच्या पर्यंत पोहोचणार. गुरु हा आपल्या जीवनाचा मोठा आधार आहे. बघा कुटुंबात नेहमी आपल्यापेक्षा मोठी माणसे असली की आपल्याला काळजी नसते पण जेव्हा कालांतराने आपणच कुटुंबात मोठे होतो तेव्हा किती फरक पडतो . वट वृक्षाखाली बागडणे आणि स्वतः वृक्षच होणे ह्यात फरक आहेच. कुटुंब प्रमुख म्हटले की जबाबदारी आली.
गुरुतत्व समजणे सोपे नाही त्यासाठी षडरीपुंची आहुती द्यावी लागते . अनेक अपमान सहन करून आयुष्यात मार्गक्रमण करायला लागते . दुर्दम्य इच्छाशक्ती लागते तेव्हा कुठे निभाव लागतो . ऊन, वारा, पाऊस काहीही असो नित्याची साधना नित्य करत राहणे हे सोपे नाही. पण जसजशी भक्ती वाढते, अनुभूती येते त्याबरोबर मनातील आशा पल्लवित होतात आणि नामस्मरणाची अवीट गोडी लागते . नामाचे महत्व समजू लागते आणि त्याचे जीवनातील अनन्य साधारण महत्व सुद्धा. सारखे मी मी, माझे माझे कमी होते आणि समाजासाठी इतरांसाठी जगण्याची प्रेरणा मिळते. गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे आणि त्याप्रती सन्मान, आदर आपल्या मनी असला तरच ते ग्रहण होईल. आपल्या पत्रिकेतील गुरु सुस्थितीत असेल तर आयुष्यात कितीही संकट, चढ उतार, आले तरी त्यातून सुरक्षित गुरूच आपल्याला काढू शकतात . आता सर्व संपले असे वाटत असतानाच पुन्हा जीवन सुरु होते ते गुरु मुळेच. जीवनातील ज्ञानाचा स्त्रोत गुरूकडे आहे आणि ते ज्ञानामृत मिळणे हे आपले परमभाग्य आहे.
मी साधना कशी करू हे विचारण्याचा प्रश्नच येत नाही . मुळात मला नाम घ्यावेसे वाटत आहे हा विचार सद्गुरू कृपेशिवाय मनात येऊच शकत नाही .त्यामुळे जेव्हा मनाची अशी अवस्था होते तेव्हा नामस्मरण सुरु करावे. कसे किती कुठे ह्या बंधनात नाम कधीच नसते. आपल्या श्वासागणिक नाम घेता आले पाहिजे जे अर्थात हळूहळू होत जाते. आपली इच्छाशक्ती , आपली गुरूंच्या प्रती असणारी भावना प्रेम जितके खोल तितके नामाची खोली अधिक. कुणी किती नाम घ्यायचे ते ज्या देवतेचे तुम्ही नाम घेत आहात तीच ठरवते आणि त्याप्रमाणे तुमचीकडून ते करवून सुद्धा घेते. एक वेळ अशी येते कि आपण नामाशिवाय राहू शकत नाही.
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम...ही अवस्था यायला वेळ लागत नाही आणि परमार्थाच्या मार्गावर आपण चालायला लागतो . नाम आपल्याला संयमित करते. मन शांत होते. नाम सकारात्मकता देते, शरीरातील ७ चक्रांचे शुद्धीकरण होते आणि संकटांशी लढण्याचे बळ मिळते. नाम हे जीवनातील जादूच्या कांडी सारखे काम करते . नामाची महती ते घेतल्याशिवाय समजणार नाही. आपण घेत असलेले नाम किंवा मंत्र हा गुरूंच्या आज्ञेशिवाय सिद्ध होत नसतो . मंत्राचे विलक्षण परिणाम अनुभवायला येणे हेही त्यांच्याच हाती असते. आपण मनापासून नाम घ्यायचे मंत्र म्हणायचे फळ कधी द्यायचे ते गुरु ठरवणार.
सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपला अंतरात्मा, आपला आतला आवाज, आपले मन काहीही म्हणा. अनेकदा आपण म्हणतो तुझा आतला आवाज काय सांगतो ते ऐक आणि तेच गुरुचे सूक्ष्म रुप आहे. गुरु आपल्या अवती भवतीच आहे , आपलाच एक भाग आहे त्याला अन्य कुठे शोधायची गरजच नाही. गुरु हे आपले कवच आहे . हा नैसर्गिक शुभग्रह आहे. आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व गुरुतुल्य व्यक्तींच्या बाबत सद्भावना , सद्विचार , कृतज्ञता असली पाहिजे तरच गुरु आपले कवच बनतील अन्यथा नाही . अनेकदा पत्रिकेत गुरु इतका बिघडतो की व्यक्तीला नैतिक , अनैतिकता , चागले वाईट कशाचेही भान राहत नाही. उपासना आपल्यासाठी आहे हे लक्षात असुदे. आपण उपासनेसाठी नाही . उपासना आपले आयुष्य समृद्ध करते . जिथे राम तिथे राम आणि राम आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होण्यासाठीच उपासना आहे. आज हनुमान जयंती . हनुमानाची सेवा ज्याला, आज कलियुगात पर्याय नाही . राहू केतूवर आवर घालण्यासाठी आणि शनी कृपा मिळवण्यासाठी हनुमान चालीसा हा उपाय सर्वश्रेष्ठ आहे . रामाचा जप करून हनुमान चालीसा नित्य म्हंटली तर आश्चर्यकारक परिणाम आणि अनुभूती मिळते . कुठलाही विचार न करता आजपासून हनुमान चालीसा, शनीचा जप अखंड करा त्याआधी आपल्या कुलस्वामिनीचा जप आणि सद्गुरू स्वामी समर्थांचा जप .आयुष्य बदलून जाईल. प्रत्येक गोष्टीत मार्ग मिळेल , प्रत्येक पहाट सुखाची असेल . शनी प्रत्येक गोष्ट विलंब करतो पण देणार नाही असे कधीच म्हणत नाही . तेव्हा संयम शिकवतोय ते आपल्याला हे समजले तरी पुरे आणि प्रतीक्षेनंतर चा प्रत्येक क्षण मात्र आनंद सौख्य भरभराट घेवून येणार आहे ...
आज शनीला तेलाचा अभिषेक, हनुमानाला रुईचा हार, शेंदूर अर्पण करायचाच आहे, पण त्याही पेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या पायावर आपला अहंकार समर्पित करायचा. अहंकार आयुष्याची माती करतो आणि ज्याला ज्याला माज अहंकार आहे त्याला शनीची अत्यंत निर्घुण शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही . आता प्रत्येकाने ठरवायचे आज काय समर्पित करायचे , काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे .
संपर्क : 8104639230