>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. मन चंगा तर सब कुछ चंगा, नाही का? मनाची अदालत , मनाचा कौल सर्वात महत्वाचा असतो. परमेश्वराची करामत अवर्णनीय आहे , त्याने आपल्याला घडवले आहे , मनही दिले आणि आत्माही . तरीही आपल्याला आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत हे काहीच माहित नसते . आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचा आहे तो श्वास म्हणजेच वायुतत्व महत्वाचे आहे. वायूचा कारक शनी कधी आपल्या श्वासाचे बटन दाबेल सांगता येत नाही. म्हणून ना भूतो ना भविष्यति..आत्ताचा क्षण जगा ,आनंद घ्या आणि द्या ..आपण सगळेच ह्या पृथ्वीवरचे सहप्रवासी आहोत.
सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य असा एकमेव प्राणी आहे ज्याला परमेश्वराने अफाट बुद्धिमत्ता प्रदान केली आहे आणि म्हणूनच देवाच्या आपल्याकडून अपेक्षाही खूप आहेत . पण आपण त्याने दिलेल्या बुद्धिमत्तेचा उपयोग कसा करतो ? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. आयुष्यभरात मिळवलेल्या आणि घालवलेल्या गोष्टींची गोळाबेरीज केली तर शून्यच येईल बरेचदा . दु:ख, निराशा, अपेक्षाभंग ह्या सगळ्याचे ओझे मनावर घेवून जगत असतो आणि ह्या सर्वाचा मनावर प्रचंड ताण येतो जो एका मर्यादेच्या बाहेर आपण सहन सुद्धा करू शकत नाही.
हव्या त्या कॉलेज ला प्रवेश मिळाला नाही , प्रमोशन नाही , हवी तशी सहचारिणी नाही , मुले आपले ऐकत नाहीत , परदेशी टूर ला जाता आले नाही , हवे तसे घर मिळाले नाही , हे झाले नाही आणि ते झाले नाही . भरमसाट अपेक्षा आणि त्या अपूर्ण राहिल्यामुळे पदरात पडलेली निराशा ह्यामुळे मनावर आणि मेंदूवर ताण येतो. बरेचदा तो ताण विकोपाला जातो आणि मग मनाचे आजार जसे विस्मृती ,विसरभोळेपणा , एकांतवास ,कुणाशीच न बोलणे , शून्यात बघत राहणे इत्यादी .
विस्मृती हा आजार आजकाल आपला पदर धरूनच चालत आहे . आजकालच्या गतिवान जीवनशैलीमुळे घड्याळ्याच्या काट्यावर जगणारे मनात विचारांचे काहूर घेऊन जगत आहेत. आज भाजी कुठली करायची , इस्त्रीचे कपडे आले का , दळण संपले का, उद्या प्रवासाला जायचं आहे, बॅग बरोबर भरली आहे ना , सगळी बिले भरली का , औषधे संपली का , आज ऑफिस मध्ये मिटिंग आहे , रजेसाठी अर्ज स्वीकारला जाईल का ? आज मोलकरीण नाही येणार, देवा ..एक ना दोन ह्या विचारांच्या गर्दीत अगदी फ्रीज उघडला तरी कशासाठी उघडला तेच आठवत नाही अनेकदा , फोन हातात घेतला तर कुणाला करायचा होता ते विसरायला होते ...क्षणाक्षणाला गोष्टी विसरतो आपण. मग म्हणतो चंद्र बिघडला, पण त्याला आपल्या रुटीननेच बिघडवले आहे ,चंद्र पूर्वीही होता ,आजही आहे आणि उद्याही असणार आहे पण किती त्याच्यावर ताण ? तोही किती सहान करणार नाही का?
आजकाल विस्मृती ही समस्या वाढत चालेलेली आहे ती मेंदूवर मनावर आलेल्या ताणामुळे. हा ताण आपण कमी करू शकतो, प्रत्येक आजाराचे मूळ हे आपल्यातच आणि आपल्या जीवनशैली मधेच दडलेले आहे. आपली मागील पिढी अतोनात कष्ट करूनही सुखी समाधानी होती . तेव्हा कुठे होता मधुमेह? रक्तदाब? आज आपण पैसे मिळवण्याचे मशीन झालो आहोत ,ना मुलांसाठी वेळ ना स्वतःसाठी!
आपण नियमित केलेली साधना , ध्यानधारणा , व्यायाम , योगा आपल्या शरीरावरची चरबी आणि मनावरचा ताण निश्चित हलका करेल पण आपण 'वेळ नाही' ह्या गोंडस आवरणाखाली त्या झाकून टाकतो आणि ज्या वेळी हे सर्व करण्याची उपरती होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
विस्मृती हा मनाचा आजार आहे . अशा लोकांना सकाळी काय खाल्ले ते आठवते पण मागचे काहीच आठवत नाही . आयुष्यात एखाद्या घटनेचा झालेला आघात सहन न होणे , अपयश ,अपेक्षाभंगाचे दुःख पचवता न येणे असे काहीही असू शकते .मधेच आठवते मधेच नाही ,काहीतरी बोलतात संदर्भ सुद्धा देतात, परत विसरतात. स्वतःच्याच कोशात ही माणसे असतात.
आयुष्यातील चढ उतारातून आपली सुटका नाही हे खरे आहे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाने ग्रहताऱ्यांशी मैत्री करायची संधी प्राप्त झाली आणि प्रत्येक गोष्टीला अनेक कंगोरे असतात हे समजू लागले. कुठलीही गोष्ट तसेच माणूस ह्या जगात पर्फेक्ट नाही चंद्र हा मनाचे प्रतिनिधित्व करणारा जल तत्वाचा कारक . जल म्हणजेच संवेदना , मन निराश होते म्हणजेच संवेदना ,भावभावना दुखावल्या जातात .
ह्या सर्व गोष्टींवर खूप विचार केल्यावर एक जाणवले. विस्मृती म्हणजे ज्या घटनांचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो त्या सर्व हो हो अगदी सर्वच गोष्टींचा विसर पडण्यासाठी त्या गोष्टी मिळालेले वरदान आहे. आयुष्यातील काही काळच आपल्या आयुष्यातून देवाने पुसून टाकला आहे, असा जर अर्थ घेतला तर तुमच्या लक्षात येईल. अशा व्यक्तींचा कुटुंबाला त्रास असू शकतो. आपले बाबा आपल्याला ओळखतच नाहीत ही मनाला असणारी टोचणी आहे , पण त्या व्यक्तीला आयुष्यात किती सुख आहे , काहीच आठवत नाही ,अशी माणसे त्यांच्याच कोषात आनंदात जगत असतात , नीट जवळून पहिले तर हेच दिसून येईल.
अशा वेळी वाटते विस्मृती हा आजार की त्या माणसाला परमेश्वराचे मिळालेले वरदान? तुम्हीही या गोष्टीचा नक्की विचार करा, अन्यथा काय विचार करायचा आहे हेच विसराल!
संपर्क : 8104639230