>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
फक्त ह्याच जन्मात नाही तर अनेक जन्मातून मनुष्य प्रवास करत असतो. जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते जेव्हा मोक्षाची प्रवेशद्वारे उघडतात . मागील जन्माच्या कर्माचा हिशोब ह्या जन्मात आणि ह्या जन्मातील कर्माचा हिशोब पुढील जन्मात असे हे चक्र फिरत असते. 'पुनरपि जननं पुनरपि मरणं' म्हंटलेच आहे.
खरंतर मोक्षाला जाण्यासाठीच जन्म असतो, पण मनुष्य धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थात अडकतो आणि मोक्ष दुरावतो . परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचे उद्दिष्ट असूनही मोक्षाकडे जाण्यास विलंब होतो . मागील जन्मातील कर्म ह्या जन्मात..मागील पानावरून पुढे चालू. ग्रह ह्या कर्माचे फळ देण्यास बांधील आहेत. थोडक्यात ग्रह कर्मफळ देण्यासाठीचे माध्यम आहेत. जसे कर्म तसे फळ म्हणून ग्रहांना कधीही दोष देण्यात अर्थ नाही कारण ते आपल्याच कर्माचे फळ देत असतात.
पत्रिकेतील षष्ठ भाव पहा . षष्ठ भाव नोकरीचा आहे. नोकरी मिळाली की खिशात पैसा खुळखुळायला लागतो आणि पैशामुळे माणसाचा “अहं'' फुलतो . पैसा आला की मग काय हवे ते करा आणि उधळा लक्ष्मी! जीवनशैली बदलते, कधीही काहीही खावे प्यावे , मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसा, अजून पैसा मग त्यासाठी घड्याळ्याच्या काट्यावर असणारे जीवन आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य चिंता विवंचना . ह्या सगळ्याचा शेवट होतो एखाद्या दीर्घ आजारात . ह्या सगळ्याचे मूळ बदललेली जीवनशैली आणि विचार सरणी. आहे त्यात समाधान मानणे सध्या कठीण आहे , इर्षा आणि त्यातून निर्माण झालेला आपल्याच लोकांबद्दलचा द्वेष तिरस्कार.एखाद्याचे कौतुक आणि खुल्या दिलाने स्तुती सुद्धा करता येत नाही आपल्याला इतक्या कोत्या मनोवृत्तीचे आहोत आपण.
पत्रिकेतील चतुर्थ भाव आपले मन , लग्न म्हणजे आपले शरीर , देह आणि आत्मा म्हणजे सूर्य . साहस , आत्मविश्वास देणारा मंगळ , बुद्धी, अभिव्यक्ती देणारा बुध , ज्ञान देणारा गुरु , आयुष्यातील सर्व सुखाची बरसात शुक्र , कष्ट , आजार , अपमान देणारा शनी .आयुष्यात अचानक घटना घडवणारा राहू , कोमात नेणारा केतू . हि सर्व मागील अनेक जन्मातील कर्म आहेत जी ग्रहांच्या माध्यमातून चांगले किंवा वाईट परिणामांचे फल प्रदान करतात .
शास्त्रात चातुर्वीद पुरुषार्थ सांगितले आहेत . पंचम भाव आपले पूर्वकर्म , नवम भविष्य आणि प्रथम आपले वर्तमान हे ज्याला समजले त्याला आपल्या जन्माचे रहस्य किंवा उद्दिष्ट समजेल. जन्म हा लादलेला नाही , आपल्या इच्छेतून आपण जन्म घेतला आहे . जन्म घेण्याची प्रबळ इच्छा झाली म्हणून मातेच्या उदरातून जन्म घेतला आहे आपण . षष्ठ भावावर विजय मिळवणे ह्याचाच अर्थ कुटुंबात सुख दुःखाच्या प्रसंगात एकत्र राहणे , समजून घेणे कुटुंबातील एक होऊन राहणे , शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शत्रू निर्माण न करणे आणि आजारांवर मात किंबहुना सुधृढ राहणे , षष्ठ भावावर विजय मिळाला तर सप्तमाचे फळ भोगता येईल.
ह्या पृथ्वीलोकावर कितीही संकटे दुःख असले तरी मनुष्याला मृत्यू नको असतो . मोक्षप्राप्ती म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आणि त्याचा ध्यास असला पाहिजे . चारही पुरुषार्थ जीवनाचे विविध टप्पे दर्शवतात आणि प्रत्येक टप्पा परिपूर्ण पणे जगून झाला तरच मोक्षाकडे वाटचाल होवू शकते. मनुष्य हा इच्छेमुळे जन्म घेतो हे आपण पाहिले.
आपले मन चतुर्थ भावात आहे आणि मन म्हणजेच आपल्या मनातील विचार . विचाराना कक्षा नाहीत .मनाला बंधनात ठेवता येत नाही कारण ते उदबत्तीच्या धुरासारखे इथे तिथे भटकत असते. मन हे असंख्य वासनांचे घर आहे. काहीना काही सारखे हवे असते , हे सर्व न संपणारे आहे म्हणूनच मोक्ष मिळणे कठीण आहे. भाव मनात प्रगट होतात आणि विचार मेंदूत . हृदयातील आणि डोक्यातील विचार जेव्हा शून्य होतील म्हणजेच कुठलीच इच्छा राहणार नाही अशी जेव्हा मनाची अवस्था होयील तेव्हा समजून जा कि तुम्ही मोक्षाच्या पायर्या चढायला लागले आहात . म्हणूनच मोक्षाच्या आधीची पायरी एकादश भाव म्हणजेच लाभ भाव. पुढील मोक्षाच्या पायरीवर पाऊल ठेवण्यापूर्वी मिळालेले सर्व लाभ तिथेच ठेवून जावे लागते . इच्छांचे परिमार्जन होणे सोपे नाही आणि म्हणूनच मोक्ष मिळणे सुद्धा तितकेसे सोपे नाही कारण आपले मन संसारातून बाहेरच येत नाही. संसार म्हणजे सार जे नेहमीच पातळ असते , न आटणारे प्रेम तिथे आहे. अजून हवे हे संपत नाही , त्यात अडकत जातो आणि मोक्ष दुरावतो. इच्छा आहेत तोपर्यंत मुक्ती नाही . षडरिपू , इच्छा आपले पाय मागे ओढतात म्हणूनच साधना , नामस्मरण आपल्याला ह्यातून बाहेर काढण्यास मदतच करते .
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या वर्षात एक उत्तम साधक बनण्याचा प्रयत्न करुया. कुणी बघितलाय मोक्ष? पण खरच असेल तर त्यासाठी साधना करण्याचा दृढनिश्चय करुया. महाराजांनी सांगितलेच आहे “ अशक्य काहीच नाही “ आपल्या जीवनात सुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील फक्त एकच गोष्ट हवी ती म्हणजे “ दुर्दम्य इच्छाशक्ती “.