तेंदूपत्ताचा अभाव : कामगारांवर उपासमारीचे संकटतुमसर : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या बिडी उद्योगावर उतरती कळा लागली आहे हे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. हजारो बिडी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. या कामगारांना 'अच्छे दिन'ची प्रतिक्षा आहे.भंडारा, गोंदिया, बालाघाट, जबलपूर जिल्ह्यातील जंगलात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात मिळत होता. त्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शेकडो बिडी कारखाने सुरु करण्यात आले होते. लाखो कामगारांच्या हाताला काम देणारा उद्योगधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहू जाऊ लागले. विज, लोहमार्ग, पाणी, शेती, रस्ते असल्याने मोठे उद्योजकांनी येथे उद्योगधंदा सुरु केले नाही, असा भूतकाळ सांगतो. काम करण्याकरिता कामगार मिळणार नाही म्हणून अनेक मोठे उद्योजकांनी येथून काढता पाय घेतला होता. आता हा बिडी उद्योग शेवटची घटका मोजत आहे. शासकीय कायदे, बिडी ओढणाऱ्यांची घटणारी संख्या, तेंदूपत्ताचे कमी प्रमाण, कामगारांची वाढलेली वय यामुळे हा उद्योग संकटात सापडला आहे. वयोवृध्द कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. शासकीय धोरण निश्चित नाही, नियमानुसार बिडी कामगारांना पेन्शन मिळत नाही, आजारांनी डोके वर काढले आहे. दूहेरी कात्रीत कामगार सापडले आहेत. सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरु आहे. जंगलात तेंदूपत्ताच नाही एक हजार गठ्ठयांना जमा करण्याकरिता केवळ ७० ते ८० रुपये मिळत आहेत. तेंदूपत्ता नसल्याने बिडी उद्योगावर संक्रात आली आहे. लोकप्रतिनिधी तथा प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहेत. (तालुका प्रतिनिधी)
बिडी उद्योगावर 'बुरे दिन'चे संकट
By admin | Published: June 07, 2015 12:43 AM