मुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्हा काँगे्रस पदाधिकाऱ्यांची मागणीभंडारा : आदर्श गैरव्यवहार प्रकरणी खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुडबुध्दीने दाखल केलेले गुन्हे व चौकशी मागे घेण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नेतृत्वातील जिल्हा काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.राज्यात काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहून खासदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात सुनियोजित षडयंत्र करुन भारतीय जनता पक्ष सुडबुध्दीचा प्रकार करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. आदर्श गैरव्यवहार प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने समिती नेमून चौकशी केली आहे. या प्रकरणाला 'क्लिन चिट' दिलेली आहे. सीबीआयने खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात सबळ पुराव्याअभावी डिसेंबर २०१३ मध्ये राज्यपालांना सबळ पुरावे नसल्याने खटला चालविण्याची परवानगी नाकारली होती. तसे निर्देश राज्य शासनाच्या लक्षात आणून दिले होते. त्यानंतरही सीबीआयवर दबाव आणून पुन्हा हा प्रकार उकरुन काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हे दाखलसंबंधी आदेश देण्यात आले. शासनाच्या या कार्यवाहीचा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. अशोक चव्हाण यांच्याविरोधातील चौकशी मागे घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सभापती विनायक बुरडे, प्यारेलाल वाघमारे, नंदू समरीत, मंदा गणविर, निलकंठ टेकाम, प्रेम वनवे, ज्ञानेश्वर राहांगडाले, मनोज मते, सुबोध इनवाने, वंदना पंधरे, दिपक जेठे, शिवा मते, के.के.पंचबुध्दे, श्रीराम चवरे, जितेद्र भदाडे, राजेश खेडीकर, आकाश कोरे, लाखनी नगरपंचायतीचे काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
अशोक चव्हाण यांच्याविरोधातील गुन्हे मागे घ्या
By admin | Published: February 06, 2016 12:41 AM