खामगाव (जि. बुलडाणा) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन दोन गटात वाद झाल्याची घटना तालुक्यातील लाखनवाडा येथे २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, नऊ जणांना अटक केली आहे. लाखनवाडा येथील आबीदखान अहेमद खान व जावेद खान अहेमद खान हे होणार्या सरपंचाच्या निवडणुकीबाबत बसथांब्यावर चर्चा करीत होते. या चर्चेवरुन त्यांचा गावातीलच समाधान सावळे यांच्याशी वाद होऊन या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये अहेमद खान रहेमान खान (वय ५0), आबीदखान अहेमद खान (वय २५), जावेद खान अहेमद खान, समधान सावळे, सुभाष सावळे असे पाच जण जखमी झाले. या घटनेनंतर दोन्ही गटातील सर्मथक समोरासमोर आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार अढाव तसेच गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते. याप्रकरणी अहेमद खान रहेमान खान यांनी हिवरखेड पो.स्टे.ला रात्री फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी समाधान रामदास सावळे, सुभाष रामदास सावळे, संजय सावळे, नवल रामदास पांढरे, गजानन मोतीराम जाधव अशा पाच जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४८, ३२४, ५0६ भादंवि सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
लाखनवाडा येथील हाणामारीप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल
By admin | Published: August 26, 2015 12:26 AM