संग्रामपूर (जि. बुलडाणा): संग्रामपूर तालुक्यातील खेडेगावामध्ये अवैध घरगुती विद्युत चोरी तसेच शेतामधील कृषीपंपासाठी मोठय़ा प्रमाणात विद्युत चोरी होत आहे.तालुक्यामध्ये सन २0१३ ते जुलै २0१५ या तीन वर्षामध्ये ३९ अवैध विद्युत चोरी करणार्यांवर कारवाई झाली आहे; परंतु तालुक्यातील अवैध घरगुती व शेतातील कृषी पंपासाठी होणारे अवैध विद्युत चोर्यांचे प्रमाण वरील तीन वर्षांमधील या आकड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गत तीन वर्षांमध्ये एकही शेतातील कृषीपंपावर कारवाई न झाल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून मिळाली आहे. तालुक्यामधील अवैध घरगुतीसाठी वीज चोर्यांचे प्रमाण वर्षनिहाय कारवाई पुढीलप्रमाणे :यामध्ये सन २0१३ मध्ये ११ कारवाया, सन २0१४ मध्ये १९ कारवाया, जुलै १५ मध्ये १ कारवाई याप्रमाणे ३ वर्षामध्ये ३९ कारवाया करण्यात आल्या. सद्यस्थितीत संग्रामपूर शहर वगळता खेडेगावामध्ये घरगुती विद्युत चोरी तसेच शेतातील कृषी पंपाकरिता विद्युत चोरीला उधाण आले आहे. यामध्ये बोडखा, धामणगाव, पळशी झांशी, मारोड, सावळा, निरोड, पंचाळा, भिलखेड, काकोडा, खोद्री, आस्वंद या गावांमध्ये दिवसाढवळ्या नागरिक विद्युत खांबावरील तारेवर आकोडे टाकुन विद्युत चोरी करीत आहेत. परिसरातील काही शेतामध्ये नवीन विहिरी खोदल्या असून, या विहिरींना पाणी लागलेले आहे; परंतु शेतामध्ये विद्युत खांब नसल्याकारणाने शेजारील शेतामधील खांबावरून १ ते दीड हजार फूट केबल टाकून या खांबावरील तारेवर आकोडे टाकून अवैध विद्युत चोरी सुरू आहे. यामध्ये एखादेवेळी विजेच्या धक्क्याने मृत्यूसुध्दा होऊ शकतो. त्याचप्रमाणे घरगुतीसाठी विद्युत चोरी करीत असताना जी विद्युत खांबावर केबल टाकल्या जाते यामधील एक केबल (अर्थींंग) म्हणून जमिनीमध्ये गाळल्या जाते. या केबलला स्पर्श झाल्यास अपघात होऊ शकतो. महावितरणकडे तक्रारी होतात; परंतु कार्यवाही होत नाही.
महावितरणकडून तीन वर्षात ३९ वीज चोरांवर कारवाई
By admin | Published: August 26, 2015 12:28 AM