लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहराला लागून असलेल्या राजूर घाटात रविवारी रात्री अंधार होताच आग लागली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अथक प्रयत्न करून आग विझविण्यात आली. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. बुलडाणा शहर अजिंठा पर्वत रांगेवार वसलेले आहे. शहराला लागून ही रांग जाते व त्याला राजूर घाट असे नाव दिलेले आहे. याच राजूर घाटातून बुलडाणा-मलकापूर मार्ग जाताे. २८ फेब्रुवारी रोजी घाटातील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात आग लागली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही आग मोठ्या क्षेत्रात पसरली. आग पाहून या मार्गाने जाणारे काही पर्यावरणप्रेमी थांबले व त्यांनी आपआपल्या परीने वनविभाग, अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्याची वाट ना बघता, बुलडाणा येथील पत्रकार मयूर निकम, अमोल घुले, विकास दौंड, आशिष खडसे व श्रीकांत पैठणेसह अजून काही लोक रात्रीच्या अंधारात या डोंगरदऱ्यात आपला जीव धोक्यात टाकून उतरले व आग विझवू लागले. काही वेळानंतर बुलडाणा अग्निशमन दल, वनविभागाचे कर्मचारी, फायर फाइटर व पोलीस मदतीला धावून आले. तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
राजूर घाटात आग, वनसंपदेचे झाले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:59 IST