बुलडाणा : शेतकर्यांना अन्न सुरक्षा, विमा सुरक्षा देण्याचे कार्य शासन करीत असून, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. देशाच्या स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ध्वजारोहण केल्यानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकंमत्री बोलत होते. शेतीला सिंचनाकरिता पाणी मिळण्यासाठी जलक्रांती साधणारे जलयुक्त शिवार अभियान राज्यात सुरू असून, अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर २.५0 लक्ष वार्षिक उत्पन्न असणार्या शेतकर्यांच्या पाल्यांचे उच्च शिक्षणाचे ५0 टक्के शुल्क भरण्याची जबाबदारी घेतली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी बुलडाणा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्याला १0 कोटी रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहे. तसेच गणित, इंग्रजी अथवा अन्य शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविणार्या मदरशांना दोन लाख रुपये अनुदान व तीन शिक्षकही शासन देणार आहे, असेही यावेळी पालकंत्री म्हणाले. बालकांच्या पोषणावर बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, अंगणवाडीत पोषण आहाराबरोबरच आता दूधही दिल्या जाणार आहे. त्यासाठी दूध भुकटीचा उपयोग केल्या जाणार आहे. राज्याच्या विकासासाठी नागपूर ते मुंबई सहापदरी राज्य महामार्ग निर्माण केल्या जाणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीवर जवळपास ५५ हजार कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे. त्याचा जिल्ह्याला फायदा होणार आहे. तर सामान्यांना महाग पडणारी औषधे शासन उभारत असलेल्या जेनेरिक दुकानांमध्ये स्वस्त दरात दिल्या जात आहे. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख, कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.
अन्न सुरक्षेबरोबरच विमा सुरक्षा - खडसे
By admin | Published: August 16, 2015 11:59 PM