खामगाव: गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दर दिवसागणिक गगनाला भिडत आहेत. कांद्याच्या भावाने शंभरी गाठल्याने शहरातील काही हॉटेल, घरगुती खानावळ आणि पाणीपुरीच्या गाडीवरून आता अचानक कांदा गायब झाल्याची वस्तुस्थिती ह्यलोकमतह्णच्या पाहणीदरम्यान उघडकीस आली. कांद्याचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने भाव वाढले आहेत. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात २000 ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भावाने मिळणारा कांदा आता तब्बल सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंंंत पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांदा ७0 ते ८0 रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. साधारण एका मध्यम हॉटेलमध्ये दररोज ३0 ते ४0 किलो कांदा लागतो. शाकाहारी हॉटेल्समध्ये भाज्यांचा रस्सा हा कांद्यापासूनच तयार केला जातो. त्यासाठी मोठया प्रमाणात कांदा लागतो. शिवाय पाणीपुरी, पावभाजी, उत्तप्पा, डोसा, मिसळ यांसारख्या अनेक खाद्यपदार्थांसाठीही कांदा भरपूर लागतो. नाश्ता, जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना खाण्यासाठी कच्चा कांदाही द्यावा लागतो. तथापि, काहींनी कच्चा कांदा देण्याऐवजी काकडी देणे सुरू केले आहे. तर ग्राहकी टिकून राहावी म्हणून अनेक ठिकाणी कांदा कमी व पात जास्त असेही दिसून येत आहे. एकूणच कांद्याने गृहिणींसोबतच व्यावसायिकांचा वांदा केला असून भाववाढ होत असल्याने डोळ्यात पाणी आणले आहे. यामुळे कांद्याची ग्राहकी कमी झाली आहे. मात्र या भाववाढीचा काहीएक फायदा शेतकर्यांना नाही.
हॉटेल आणि पाणीपुरीच्या गाडीवरून कांदा गायब!
By admin | Published: August 25, 2015 2:07 AM